बंद

धार्मिक स्थळे

कसबा गणपती

कसबा गणपती

कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळयासमोर तंबू बांधला. आता ते पुण्यातील प्रसिध्द मंदिर आहे.

चतु:श्रुंगी मंदिर

चतुः शृंगी मंदिर

चतुः शृंगी मंदिर ही एक लहान टेकडी आहे जी दुर्गा देवीला अर्पण केलेली आहे. या आधी तेथे अंबेश्वरी ही देवता होती. वर्षातून एकदा अश्विन महिन्यात येथे नवरात्री जत्रा भरते. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले.

पर्वती

पर्वती

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेली टेकडी आहे.पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायऱ्या चढून येथे पोहोचता येते.[१] या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले.

भीमाशंकर

भीमाशंकर

भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर पुणे शहरापासून 125 कि.मी. अंतरावर खेड तालुक्याजवळ आहे. हे महाराष्ट्रातील पाच जोतिर्लिंगांपैकी एक जोतिर्लिंग आहे. नाना फडवणीसांनी या ठिकाणी शंकराचे मंदिर बांधले होते. भीमाशंकरच्या जवळच मनमाडच्या टेकडया आहेत. या टेकडयांवर भुतींग, अंबा-अंबिका, व भीमाशंकर यांच्या कोरीव लेण्या आहेत. मान्सून आणि थंडीच्या दिवसांत भीमाशंकरच्या सौंदर्यात अधिक भर पडते. भीमाशंकर हे राखीव जंगल आहे आणि तेथे जंगली प्राण्यांचे अभयारण्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे व फुले पहायला मिळतात.

जेजुरी

जेजुरी

जेजुरी हे पुण्यापासून 40 कि. मी. अंतरावर असून तेथे खंडोबाचे प्राचीन मंदिर असल्यामुळे ते खंडोबाची जेजुरी म्हणुन ओळखले जाते. चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे जत्रा भरते. मंदिरात जाण्याच्या वाटेवरुन आपल्याला दिवे घाट दिसतो. या मंदिरातील दिपमाला प्रसिध्द आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 पाय-या चढून जावे लागते. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी याच ठिकाणी मुघल सत्ते विरुध्द व्यूहरचना करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे जेजुरीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्या काळातील बरीचशी शस्त्रे आपल्याला तेथे पाहायला मिळतात.

अष्टविनायक

अष्टविनायक

गणपती बाप्पा हे त्याच्या भक्तांचे रक्षणकर्ता असतात. निसर्गाने शिल्पाकृती केलेल्या अशा गणपतीच्या आठ प्रतिमा निसर्गात सापडल्या आणि त्या जेथे सापडल्या तेथेच त्यांची मंदिर बांधून स्थापना करण्यात आली. या सर्व प्रतिमा स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नहर व लेण्याद्रीचा गिरीजात्मक, सिध्दटेकचा सिद्धीविनायक हे सहा गणपती पुणे जिल्हयात आहेत.

देहू

देहू

देहू हे संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असून ते इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. हे पुण्यापासून 34 कि.मी. अंतरावर आहे.

आळंदी

आळंदी

आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रुपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिध्द ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिध्द भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.

नीरा नरसिंहपूर

निरा नरसिंहपूर

निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आहे.नीरा भीमा या पवित्र संगमावर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या आराध्य दैवताची स्थापना केली. त्याने केलेल्या वालुकामूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केले. त्यामुळे या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे दैवत श्रीलक्ष्मी नृसिंह या नावाने प्रसिद्ध आहे.
सांप्रतचे श्रींचे देवालय हे उत्तुंग व भव्य असे असून पेशवे काळातील वास्तुतशिल्पाचा हा आदर्श  आहे.  अधिक माहितीसाठी  येथे भेट द्या. http://narasingpur.in